शुक्रवार, २ मार्च, २०१८

भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर कंबार:-


● भारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची  निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे.  ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’ कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा  पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले तर  उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले.

●यू. आर अनंतमूर्ती यांच्या अध्यक्षीय पदाच्या निवडीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी साहित्य अकादमीच्या इतिहासात दुस-यांदा ही निवडणूक झाली. अकादमीच्या जनरल कौन्सिलच्या 99 सदस्यांनी पाच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली. या निवडणूकीत चंद्रशेखर कंबार  यांनी 56 मतांनी आपले स्थान बळकट केले तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना 29 मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ 4 च मते पडली.  विनायक कृष्णा गोकाक (1983) आणि यू.आर अनंतमूर्ती (1993) यांच्यानंतर तिस-या कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी, लेखक, दिग्दर्शक असे प्रा. चंद्रशेखर कंबार  यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

●हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. अकादमीच्या नियामक मंडळाचे गेल्या दहा वर्षांपासून सदस्य आहेत. 2013-2018 कालावधीत त्यांनी अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले. ’पद्मश्री’ सारख्या सन्मानाचे ते मानकरी ठरले असून, कबीर सन्मान,कालिदास सन्मानाचे ते मानकरी ठरले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा